
काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे आवाहन
नितेश गट्टीवार न्यूज जागर गडचिरोली,दि.१ जुन:
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांची सुपीक जमीन एमआयडीसीसाठी तसेच गडचिरोली तालुक्यातील हिरापूर-गुरवळा परिसरातील जमीन विमानतळ प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारे हे जमीन अधिग्रहण तात्काळ रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने दि. 04 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे भव्य ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या आंदोलनाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केले आहे.
बोलताना ॲड. कोवासे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन बळजबरीने अधिग्रहित केली जात आहे. अशा अन्यायकारक निर्णयांविरोधात काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे आणि पुढेही राहील.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद द्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

