गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक विकास आणि आदिवासी सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरिता कामुनाबाई काशिराम किरंगे यांची प्रतिष्ठित “राष्ट्र गौरव पुरस्कार 2025” साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय नामांकन (ISO 2015) प्राप्त डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया तर्फे प्रदान करण्यात येतो.
सामाजिक सेवेत दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या सरिता किरंगे यांनी वनहक्क कायदा (FRA) आणि पेसा कायदा याबाबत जिल्ह्यातील अनेक ग्रामसभांना प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले आहे. त्यांनी सामूहिक वनहक्क व्यवस्थापन, आदिवासी हक्कांची अंमलबजावणी तसेच सांस्कृतिक चळवळींच्या माध्यमातून आदिवासी समाज जागृती घडवून आणली आहे. या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची “सामाजिक सेवा क्षेत्र” या विभागातून राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे.
हा पुरस्कार समारंभ बुधवार, दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सरिता कामुनाबाई काशिराम किरंगे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
“राष्ट्र गौरव पुरस्कार” हा दैनिक कर्णधार वृत्तपत्र आणि डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जातो. या पुरस्काराद्वारे पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, विधी, महिला, सहकार, पतसंस्था इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.
गडचिरोली जिल्ह्यातून हा पुरस्कार मिळवणाऱ्या सरिता किरंगे यांचा हा सन्मान स्थानिक समाजसेवक व ग्रामसभांमध्ये अभिमानाचा विषय ठरत आहे.

खूप छान सरिता किरंगे या एका जिल्हा परिवर्तन समिती गडचिरोली यांच्या पुढाकारणे वनहक्क कायदा पेसा कायदा रोजगार हमी कायदा जैवविविधाता कायदा, ग्रामसभा सक्ष्मीकरन कार्य चालू आहे