
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी, दि. २ जुलै : स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढती वीजबिले कमी करावीत आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांवरील अन्याय थांबवावा, या प्रमुख मागण्यांसाठी चामोर्शी येथील महावितरण वितरण कार्यालयावर जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका युवक काँग्रेस, शहर युवक काँग्रेस व NSUI यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता देवगडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात तसेच वाढत्या वीजबिलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याचा शासनाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, तालुकाध्यक्ष वसंत राऊत,गुरु सातपुते सर, NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विलास चीचघरे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड, हेमंत कोवासे, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, अमर मोगरे, तेजस कोंडेकर, विनोद खोबे,सुभाष कोठारे, आचल चलकलवार, ओमप्रकाश चौधरी, नेहा आभारे, संजय बुरांडे, पीपलदास सोयाम, जावेद खान तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सरकारने जनतेच्या हिताचा विचार करून स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ रद्द करावी, वाढत्या वीजबिलांवर नियंत्रण आणावे आणि वीज ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावर उपकार्यकारी अभियंता देवगडे यांनी संबंधित मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

