
रोटरी क्लब व जैविक उत्पादन समूहा तर्फे आयोजित शेती कार्यशाळा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आश्वासन
वर्धा – विदर्भातील पाच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होते. कर्ज घेऊन लागवड केलेल्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. वर्धा जिल्ह्याला शेतकरी आत्महत्या म्हणून लागलेला ठसा मिटविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे गृह (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर ( dr. Pankaj Bhoyar )यांनी केले.
रोटरी क्लब गांधी सिटी व जैविक उत्पादक समुह वर्धाच्या संयुक्त विद्यमाने चरखागृह येथे कमी खर्चात भरघोस उत्पादन या विषयावर एसआरटी शून्य मशागत शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत. कार्यक्रमाला वसंतराव नाईक कृषि विद्यापिठ परभणीचे कुलगुरु इंद्रमणी मिश्रा, सगुना रुरल फाऊंडेशन रायगडचे संस्थापक व कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, भारत सरकारच्या जैविक शेती प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. अजयसिंह राजपूत, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री विजय तांबे, रोटरी क्लब गांधी सिटीच्या अध्यक्ष साधना बन्नोरे, मनोज मोहता, गजानन पडोळे, फरहत जहीर, उमेश टावरी, महेश मोकलकर स्मिता व्यास आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या शेतीचा विकास आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषि विभागाकडून मार्गदर्शन घेऊन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन जैविक शेतीकडे वळावे. सोबतच शेती पुरक दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, शेळीपालन यासारखे उद्योग सुरु केल्यास नापिकीमुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या थांबविण्यास मदत होईल, असे पुढे बोलतांना पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरण्यासाठी बारामती येथील शेती संशोधन केंद्रासोबतच ईज्राईल सारख्या देशामध्ये शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येत आहे. अभ्यास दौऱ्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असेही भोयर म्हणाले.
राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकरी हिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

