
सिंदेवाही, ऑक्टोबर १३: गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावरील सिंदेवाही-आलेवाही रेल्वे क्रॉसिंगजवळ रविवारी (आज) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला आहे. ‘टी-४०’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघाचा जागीच मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया–बल्लारशाह पॅसेंजर ट्रेन या परिसरातून जात असताना हा अपघात झाला. वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याला वेगात आलेल्या रेल्वेची जोरदार धडक बसली. सिंदेवाही रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर सोनू कुमार यांनी तत्काळ सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार यांना घटनेची माहिती दिली.
वनविभाग अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
या दुर्घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे. वाघाच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि अपघात कोणत्या परिस्थितीत घडला, याची सखोल चौकशी वन विभागाकडून केली जात आहे.
यावेळी सहायक वनसंरक्षक (ACF) गायकवाड, उपवनसंरक्षक (DCF) कुमारस्वामी, वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार, नितीन गडपायले आणि वनविभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सिंदेवाही-आलेवाही पट्ट्यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा वेग कमी ठेवण्याबाबत वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अपघातामुळे चंद्रपूर वन विभागात वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


