
महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा; तक्रारीच्या ग्राहकांकडे जुना व स्मार्ट मीटर समांतर लावण्याचे अभियंत्यांचे आश्वासन
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढलेली वीज बिले, मीटरच्या अचूकतेबाबत निर्माण झालेले प्रश्न आणि ग्राहकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कोरचीत वीज ग्राहकांचा संताप आज रस्त्यावर उतरला. दुपारी सुमारे १ वाजता नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत स्मार्ट मीटरविरोधात जोरदार आवाज उठविला.

मोर्चादरम्यान ग्राहकांनी “स्मार्ट मीटर नको, जुने पारंपरिक मीटर पुन्हा द्या” अशी मागणी करत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. उपविभागीय अभियंता सुमीत वान्ढरे आणि अभियंता नरेश कोरचा यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
“बिलाचा फैसला मीटरच्या तुलनेनेच!”
यावेळी उपविभागीय अभियंता सुमीत वान्ढरे यांनी तक्रारदार ग्राहकांसाठी महत्त्वाचे आश्वासन दिले. ज्या ग्राहकाची स्मार्ट मीटरबाबत तक्रार असेल, त्यांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर आणि जुना पारंपरिक मीटर समांतर लावून दोन्हींच्या रीडिंगची तुलना करण्यात येईल. ज्या मीटरमुळे बिल कमी येईल, तो मीटर नवीन असो अथवा जुना, तोच कायम ठेवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटरची अचूकता तपासण्यासाठी निवडक ग्राहकांच्या ठिकाणी १० दिवस स्मार्ट मीटर आणि १० दिवस पूर्वीचा पारंपरिक मीटर लावून प्रत्यक्ष वीज वापराची तुलना करण्याची मागणी ग्राहकांनी केली. ही चाचणी ग्राहकांच्या उपस्थितीत करण्यात यावी आणि त्याचा लेखी अहवाल देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच प्रमाणित टेस्ट मीटरद्वारे स्मार्ट मीटरची अचूकता तपासून त्याचा अहवाल संबंधित ग्राहकांना देण्यात यावा, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वाढलेल्या वीज बिलांची चौकशी करून चुकीची आकारणी असल्यास बिलात दुरुस्ती करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
“ग्राहकांच्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण झाले नाही, तर न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,” असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
निवेदन देताना शालिकराम कराडे, दामोधर कुंभारे, जयंत मोहुर्ले, निरिन्गसाय मडावी, हिरामन मोहुर्ले, रोशन बोरकर,डा. शैलेंद्र बिसेन,अमरनाथ ओल्के, प्रभाकर कराडे, हेमंत बेंद्रे, श्रीहरी मोहुर्ले, विठ्ठल गुरनुले,अशोक गुरनुले, अविनाश मोहुर्ले, विनोद गुरनुले,पंकज अटभैया, गोपाल मोहुर्ले, यादव खोब्रागडे, बिसन साखरे, शिवप्रसाद भक्ता, ईश्वर साखरे, ताजुखा पठाण, नसिम पठाण,सिताबाई हिळामी, समसेरखा पठाण, वन्जारी मोहगाव, यांच्यासह कोचीनारा, मोहगाव व आजुबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने वीज ग्राहक व नागरिक उपस्थित होते.
महावितरणकडून देण्यात आलेल्या या आश्वासनामुळे तक्रारदार ग्राहकांच्या वीज वापराची प्रत्यक्ष तुलना होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्मार्ट की पारंपरिक—कमी बिल कोण देतो, याचा फैसला प्रत्यक्ष रीडिंगमधून होणार आहे

