
नितेश गट्टीवार गडचिरोली/कोरची दि.१९ एप्रिल :
तालुका कोरची अंतर्गत येणाऱ्या प्रतापगड, नाडेकल व बेटकाठी टोला या दुर्गम गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या गावांमध्ये वीज, रस्ते, दळणवळण यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पोहोचलेल्या नाहीत, ही बाब शासनाच्या उदासीन कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
विशेष म्हणजे ही गावे कोरची तालुक्यात येत असली तरी गट ग्रामपंचायत व पंचायत समिती कुरखेडा तालुक्यात असल्यामुळे प्रशासकीय गोंधळ निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत खोब्रामेंढा येथे कोणतेही शासकीय काम असल्यास नागरिकांना तब्बल ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था असल्यामुळे हा प्रवास अधिकच कठीण ठरत असून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

देशभरात विकासाच्या गप्पा मारल्या जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील या गावांमध्ये मात्र अजूनही अंधार आणि दळणवळणाचा अभाव कायम आहे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यकाळातही या भागातील वीज व रस्त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या गावांचा विकास ठप्प झाल्याचा आरोपही स्थानिकांनी केला.
अजून धक्कादायक बाब म्हणजे, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांत कोणताही लोकप्रतिनिधी या गावांमध्ये पोहोचला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशा परिस्थितीत प्रथमच आमदार रामदास मसराम यांनी या दुर्गम भागाला भेट देत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली.
या भेटीदरम्यान आमदार मसराम यांनी कुरखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धीरज पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित गावांना तात्काळ भेट देण्याचे आदेश दिले. तसेच संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गावांतील वीज, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
आमदार रामदास मसराम यांच्या या पुढाकारामुळे ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने आता तरी या दुर्गम गावांकडे गांभीर्याने लक्ष देऊन विकासकामे तातडीने हाती घ्यावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
त्या प्रसंगी उपस्थित काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी सभापती श्रावण मातराम,काँग्रेस कमिटी जिल्हा महासचिव परमेश्वर लोंहबरे,युवक काँग्रेस कमिटी विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, गुलाब पटेल नैताम, अंगणवाडी सेविका नरोटे, राधेश्याम नरोटे, विकास नरोटे, रामविकास नैताम, उपस्थित होते

