
‘माझ्या स्वप्नातील भारत’ वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चामोर्शी,दि.१३ ॶॉगस्ट : शासनाच्या आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथे देशभक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले. शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नितेश गट्टीवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य डी. आर. चौधरी होते. यावेळी उपप्राचार्य एस. एम. भर्रे, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त केली.

राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिर्मितीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या ओघवत्या भाषणातून विकसित, सक्षम, स्वावलंबी आणि प्रगत भारताचे स्वप्न मांडले.
विद्यार्थ्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, शेती, रोजगार, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या विविध विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. त्यांच्या वक्तृत्वातून देशाच्या विकासात तरुण पिढीची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव प्रकर्षाने झाली.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी यांचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

