
समृद्धी महामार्गावर पुन्हा दरोड्याची घटना घडली
मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लक्ष्य करून साडेचार किलो सोने आणि रोकड लुटले
व्यापाऱ्याच्या चालकाचाही दरोडेखोरांसोबत सहभाग असल्याचा संशयव्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण, महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्न

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा दरोड्याची घटना घडली असून या घटनेमुळे या महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईतील नामांकित सराफा व्यापारी शेषमलजी जैन Sheshmalji Jain व्यापाराची कामे आटपून मुंबईच्या दिशेने येत असताना दरोडेखोरांनी त्यांना घेरून त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर जैन यांच्या बॅगेतील साडेचार ते पाच किलो सोने आणि रोकड रक्कम पळवले. या प्रकरणी जैन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सराफा व्यापारी शेषमलजी जैन हे आपल्या व्यापाराच्या कामानिमित्त खामगाव येथे आले होते. काल संध्याकाळी व्यापाराची कामे आटोपून जैन परत मुंबईला निघाले होते. दरम्यान, मेहकर टोल नाक्यानंतर काही अंतरावर त्यांच्या वाहनचालकाने अचानक कार थांबवली. चालकाने व्यापाऱ्याला “मला फ्रेश व्हायचं आहे” असे सांगून वाहन रस्त्याच्या कडेला लावले. याच क्षणी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने अचानक त्यांना घेरलं आणि चार दरोडेखोरांनी गाडीत घुसून व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली.या हल्ल्यामुळे जैन यांच्या डोळ्याला इजा झाली आणि त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीत असलेली मौल्यवान बॅग पळवून नेली. त्या बॅगेत साडेचार ते पाच किलो सोने आणि रोकड रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर जैन यांचा कारचालक देखील दरोडेखोरांच्या गाडीत बसून पळून गेला, यामुळे संपूर्ण घटनेत आतील गुप्त संगनमताचा संशय अधिकच गडद झाला आहे.दरोड्यानंतर जैन यांनी जीवाची पर्वा न करता पोलिसांना माहिती दिली. मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत व्यापाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. व्यापाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पावडर गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, मात्र सध्या ते उपचार घेत असून धोक्याबाहेर असल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांना तपासादरम्यान दरोडेखोरांची कार अकोला जिल्ह्यातील पातुर परिसरात सापडली, पण दरोडेखोर मात्र तेव्हाच पसार झाले होते.या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीपासूनच समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना वारंवार घडत होत्या. अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले तरी, आता या महामार्गावर दगडफेक, वाहन थांबवून लुटमारी, तसेच अशा प्रकारच्या दरोड्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे. राज्य सरकारकडून हा महामार्ग सुरक्षित व जलद प्रवासासाठी उभारण्यात आला होता, मात्र सातत्याने घडणाऱ्या घटना आणि गुन्हेगारीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

