सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
गडचिरोली :-
शिवणी जवळील पोटफोडी नदीवरील पुलिया आणि तळोधी जवळील पोर नदीवरील पुलिया वर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. वाहनांचे नुकसान होत असून कधीही मोठा अपघात घडू शकतो, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते व पुलियांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांकडून गंभीर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आजाद समाज पार्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देत ७ दिवसांच्या आत दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाने दिला असून त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागावर राहील, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन देताना पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, गडचिरोली तालुकाध्यक्ष प्रेम मडावी, सचिव मोसम मेश्राम उपस्थित होते.
——————
