
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सभापतीपदाचा मार्ग मोकळा; अविरोध निवडीने संचालकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला न्यायालयीन वाद अखेर संपुष्टात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अतुलभाऊ गण्यारपवार यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे तब्बल तीन वर्षांनंतर अतुल गण्यारपवार यांनी आज, ४ सप्टेंबर रोजी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारत पुन्हा विराजमान झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा घेण्यात आली. चामोर्शीचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी एस. बी. सहारे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपस्थित संचालकांना अतुल गण्यारपवार यांच्या उमेदवारीबाबत कोणाला काही आक्षेप आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावेळी कोणत्याही संचालकाने आक्षेप नोंदविला नाही. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अतुलभाऊ गण्यारपवार यांची सभापतीपदी अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
तीन वर्षांची न्यायालयीन लढाई अखेर यशस्वी
सुमारे तीन वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी अतुल गण्यारपवार यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तत्कालीन निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज खारीज केला. या निर्णयाविरोधात गण्यारपवार यांनी नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागितला.
तब्बल तीन वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर १७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने तत्कालीन निर्णयाला धक्का देत खारीज केलेला अर्ज ग्राह्य धरला, त्यामुळे अतुल गण्यारपवार यांच्या सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा निबंधक यांच्या आदेशाने आज सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी एस. बी. सहारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
एकमताने पुन्हा सभापतीपदी
अतुल गण्यारपवार यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज असल्याने आणि उपस्थित संचालकांकडून कोणताही आक्षेप नोंदविण्यात न आल्याने त्यांची अविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच अतुलभाऊ गण्यारपवार यांनी सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.
या निर्णयामुळे बाजार समितीतील संचालक, शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेली बाजार समितीची विविध कामे आता वेगाने मार्गी लागतील, अशी अपेक्षा शेतकरी व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
न्यायालयीन लढाईत मिळविलेला विजय आणि अविरोध पुनरागमनामुळे अतुल गण्यारपवार यांच्या समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

