
गडचिरोली,दि.९ जूलै: गडचिरोली जिल्ह्यातील विविध नगरपंचायतींना नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासकीय कामकाज आणि विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरभवनांची अत्यंत आवश्यकता असून, प्रत्येक नगरपंचायतीस नगरभवन बांधकामासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी माजी आमदार डॉ. होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नगरपंचायतींकडे अद्ययावत आणि सुसज्ज नगरभवनांची कमतरता असल्याने नागरिकांना विविध शासकीय सेवा, बैठका आणि विकासकामांच्या नियोजनात अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. नगरभवन उभारणीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागामार्फत प्रस्तावाची सकारात्मकपणे तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, माजी पंचायत समिती उपसभापती विलास देशमुखे, नीरज पटेल तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

