
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
चामोर्शी,दि.२५ जून:-
चामोर्शी शहर व परिसरात वारंवार होणारी वीज खंडित, कमी-जास्त व्होल्टेजची समस्या तसेच अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत चामोर्शी पत्रकार संघ, चामोर्शी यांच्या वतीने महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले.

यावेळी चामोर्शी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विनोद खोबे,सचिव सोनू वाळके, कार्याध्यक्ष नितेश गट्टीवार, उपाध्यक्ष श्रावण वाकोडे व धनराज वासेकर, सहसचिव मारोती बारसागडे, संघटक सुखसागर झाडे, सल्लागार हस्ते भगत, कोषाध्यक्ष अरुण गव्हारे आदी सदस्य उपस्थित होते.
चामोर्शी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक अभियंत्यांची भेट घेऊन चामोर्शी शहरातील वाढत्या वीज समस्यांकडे लक्ष वेधले. वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व लघुउद्योजकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात वीज खंडित होण्याची कारणे सार्वजनिक करणे, कमी-जास्त व्होल्टेजमुळे होणाऱ्या नुकसानाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे, वाढत्या वीजभारानुसार नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, वीज वितरण व्यवस्थेचे तांत्रिक ऑडिट करणे, तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच विद्यमान कार्यरत मिटर चांगले असतांना स्मार्ट मीटर बसवू नये.अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. महावितरणच्या अपुऱ्या नियोजनाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू नये आणि भविष्यात अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी चामोर्शी पत्रकार संघाने केली आहे.
महावितरण प्रशासनाने निवेदनाची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

