
:- जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केले. नवनियुक्त जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. होळी यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन नविन वर्षांची डायरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांबाबत विचारविनिमय झाला. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देणे, तसेच लोकहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. होळी यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या.
नवनियुक्त जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शासनाच्या धोरणांनुसार पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

