
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
न रस्ता, न पूल, न पिण्याच्या पाण्याची सुविधा; ४० कुटुंबांची वर्षानुवर्षे फरफट — विद्यार्थ्यांना शाळेसाठी ७ किमी पायपीट
कोरची : राज्याच्या निर्मितीला अनेक दशके उलटूनही ग्रामीण भागातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास अद्याप कागदावरच असल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील टवेटोला येथे पाहायला मिळत आहे. पिटेशूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुमारे ४० लोकवस्तीच्या टवेटोला गावाला जोडणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांचा संपर्क अधिकच बिकट होतो.

पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे अक्षरशः साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे पायी चालणेही कठीण होते. शेतात जाणे, शेतीमाल बाजारात नेणे, आजारी व्यक्तींना दवाखान्यात घेऊन जाणे यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चिखलात ट्रॅक्टर, बैलगाड्या अडकण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष
टवेटोला गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. गावात सरकारी विहीर किंवा बोरवेलची सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना नाल्यात झरा खोदून पिण्याचे पाणी मिळवावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ता, पूल आणि पाणी अशा मूलभूत सुविधांपासून गाव वंचित असताना प्रशासनाचे लक्ष कधी जाणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
शाळा, अंगणवाडी आणि आरोग्यसेवाही दूर
गावात अंगणवाडीची सुविधा नसल्याने लहान मुलांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांसाठी शाळा सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्यारापत्ती येथे आहे. आरोग्याच्या उपचारांसाठीही ग्रामस्थांना ग्यारापत्ती येथेच जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात विशेषतः महिला, बालके, वृद्ध आणि आजारी रुग्णांची मोठी गैरसोय होते.
आदिवासीबहुल जिल्ह्यात आदिवासी गावच सुविधांपासून वंचित
गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी असतानाही आदिवासीबहुल दुर्गम गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
‘आता तरी रस्त्याचे भाग्य उजळणार का?’
राज्याच्या स्थापनेपासून उपेक्षित राहिलेल्या टवेटोला गावाच्या रस्त्याचे भाग्य आता तरी उजळणार का? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, नाल्यावर आवश्यक त्या ठिकाणी पूल बांधावा तसेच गावासाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घनश्याम गोटा, महरीबाई गोटा, वच्छाला गोटा, वैशाली गोटा, जिगमीन गोटा, राजुला गोटा, माया गोटा, घसुराम गोटा, गजानाथ गोटा, रामदास उसेडी, धसोतीबाई उसेंडी, हेमंत उसेंडी, हनुमान उसेंडी, जितेंद्र उसेंडी, रामीतीबाई उसेंडी, कौसल्या उसेंडी, दिनेश उसेंडी, प्रिश उसेंडी, विजय तुलावी, विसनाथ गोटा, सुमित्रा गोटा, रूतीक गोटा, विस्ट गोटा, रामलाल सिडको, कुमारसिंग हिडको, कृष्णा गोटा, मंगला गोटा, महेश वंशा गोटा, शुभम गोटा, विक्रम तुलावी, मनात तुलावी यांच्यासह टवेटोला परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने रस्ता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

