
आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानंतर कन्नमवार जलाशयाचे पाणी धान रोवणीसाठी सोडले
चामोर्शी/घोट, दि. ११ ऑगस्ट:
चामोर्शी तालुक्यातील रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे यांच्या निर्देशानुसार रेगडी येथील दीना धरण (कन्नमवार जलाशय) याचे पाणी धान रोवणीसाठी सोडण्यात आले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याअभावी खोळंबलेल्या धान रोवणीला वेग येणार असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. परिणामी धान रोवणीची कामे मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. काही शेतकरी मोटारपंपाच्या सहाय्याने रोवणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, वाढता खर्च आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे कन्नमवार जलाशयातून पाणी सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडण्याचे निर्देश दिले. याबाबत मुंबईहून भ्रमणध्वनीद्वारे बोलताना त्यांनी “मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.
जलपूजन करून पाण्याचा विसर्ग
आमदारांच्या निर्देशानंतर मंगळवारी घोट मार्गावरील गोलाबाई देवस्थान येथे जलपूजन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक अभियंता विकास दूधबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्नमवार जलाशयाच्या पाण्याचे विधिवत पूजन करून धान रोवणीसाठी पाणी सोडण्यात आले.
पाणी सोडण्यात आल्याने रेगडी, हळदवाही तसेच परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून रखडलेल्या रोवणीच्या कामांना आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे, माजी जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, घोटच्या सरपंच रूपाली दूधबळे, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनी वरघंटे, महामंत्री संजय खेडेकर, विकास मैत्र, कविता किरमे, विलास उईके, राजेश्वर चौधरी, नीरज रामानुजनवार, नरेश अलसावार, श्रावण सोनटक्के, माणिक कोहळे, प्रशांत पालारपवार, विनोद किरमे, रोहिदास धोटे, संतोष दूधबळे, आनंदराव सातपुते, सुमेन विश्वास, पलाश घरामी, महेश विश्वास, पोपट आभारे, सोम वैद्य, उपसरपंच मिहीर विश्वास, सुकंठ रॉय, प्रकाश सातपुते तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पाणी मिळाल्याने रोवणीची कामे पुन्हा सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेतल्याबद्दल आमदार मिलिंद नरोटे यांचे परिसरातील शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले.”

