
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
चामोर्शी,दि.६ जूलै:रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नवेगाव रै ग्रामपंचायत अंतर्गत सुभाषनगर वार्ड क्र. ३ मधील नागरिकांनी प्रशासनाचा अभिनय निषेध केला. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला सीसी रोडचा प्रश्न मार्गी न लागल्याने चिखलाने माखलेल्या रस्त्यावर ग्रामस्थांनी चक्क ‘धान रोवणी’ करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
सुभाषनगर वॉर्डमधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून सीसी रोडच्या निर्मितीसाठी सातत्याने प्रशासनाकडे मागणी करत आहेत. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. रस्त्यावर साचलेला चिखल आणि पावसाळ्यात होणारी दुरवस्था यामुळे येथील नागरिकांचे विशेषतः महिला व बालकांचे जीवन नरकमय झाले आहे. वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

यावेळी सुभाषनगर येथील रहिवाशांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला. या अभिनव आंदोलनात प्रामुख्याने रामचंद्र सातपुते, गुरुदास गेडाम, रामदास टिकले, तुळशीदास टिकले, निमाई बारई यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
रस्त्याची दुर्दशा आणि नागरिकांचा वाढता रोष पाहता आता ग्रामपंचायत प्रशासन यावर नेमकी काय भूमीचा घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी त्वरित रस्ता बांधकामाची मागणी लावून धरली असून, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

