
नितेश गट्टीवार, गडचिरोली (आरमोरी) ,दि.23 मार्च
आरमोरी तालुक्यातील देलोडा बुज येथे छात्र भारती विद्यार्थी संघटनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून, मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात संघटनेने आक्रमक भूमिका घेत लढा तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला.
बैठकीला मार्गदर्शक म्हणून छात्र भारतीचे माजी राज्य उपाध्यक्ष उमेशभाऊ उईके, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते वामन राऊत, छात्र भारतीचे जिल्हा समन्व्यक निलेश राऊत हे प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संघटित होण्याचे आणि अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

उमेशभाऊ उईके यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करत सांगितले की, “मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मराठी भाषेच्या अस्तित्वावर घाला आहे. छात्र भारती या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरली असून, हा लढा आता अधिक व्यापक आणि तीव्र केला जाईल.” त्यांनी विद्यार्थ्यांना संघटनेत सामील होऊन एकतेचे बळ दाखवण्याचे आवाहन केले.
पुंडलिक देशमुख यांनीही सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “सध्याचे धोरण हे शेतकरी आणि विद्यार्थ्यांविरोधात आहे. शिक्षण व्यवस्थेची होत असलेली अधोगती थांबवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना सजग राहून आपल्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.
वामन राऊत यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर भर देत विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेवून काम करण्याचे मार्गदर्शन केले.
या बैठकीत छात्र भारतीच्या आरमोरी तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली असून, आगामी काळात मराठी शाळा वाचवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी एकजूट दाखवत “शिक्षण वाचवा, मराठी वाचवा” असा जोरदार नारा देत सरकारविरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला. यावेळी छात्र भारतीची आरमोरी तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्ष पदी समीर देशमुख, उपाध्यक्ष जानवी हुलके तालुका उपाध्यक्ष, सत्यवान देशमुख सचिव, चरितार्थ मोगरकर कार्यवाहक, केतन राऊत सहसचिव, दीपरत्न सहारे संघटक, दिक्षा हूलके युवती संघटिका, तनुशा वासनिक, चैताली लाडे, वेदांत मोंगरकर, रिया म्हशाखेत्री, रिया मडावी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
छात्र भारती की खास बात, लढाई पढाई साथ साथ…✊🔥

