
नितेश गट्टीवार गडचिरोली, दि.16 :
कौशल्य, रोजगार व उद्योजकता, नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा निबंध लेखन स्वरूपात असून निबंधाचा विषय ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य’ असा आहे. निबंध स्पर्धा ही मराठी भाषेत असून स्पर्धचे दोन गट ठेवण्यात आले आहेत.

गट १ मध्ये आय.टी.आय. / डिप्लोमा प्रशिक्षणार्थी व उत्तीर्ण विद्यार्थी / बायफोकल व एमसीव्हिसी (mcvc) विद्यार्थ्यांसाठी ५०० ते ८०० शब्द मर्यादा असेल,गट २ मध्ये पुरुष/महिला खुला गटासाठी ८०० ते १२०० शब्द मर्यादा असेल
निबंध मूळ (सत्यप्रत) असावा.कॉपी आढळल्यास स्पर्धक अपात्र ठरेल.प्रत्येक स्पर्धकाने एकच निबंध सादर करावा व मजकूर सुस्पष्ट आणि सुसंस्कृत असावा.
निबंध हस्तलिखित किंवा टंकलिखित स्वरूपात स्वीकारला जाईल. मात्र अंतिम सादरीकरण पीडीएफ स्वरूपातच करणे आवश्यक आहे. निबंध टाईप करून किंवा हस्तलिखित निबंध https://forms.gle/RcFPhcUgY8X4P2NT8 लिंकवर अपलोड करावा.
पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, आयटीआय / शाळा / महाविद्यालयाचे नाव व पूर्ण पत्ता ही माहिती स्पर्धकांनी भरावी.
निबंधाचे मूल्यांकन मांडणी, भाषा, मौलिकता, दृष्टिकोन आणि सर्जनशीलता या निकषांवर केले जाईल.
विजेत्यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस ३१ हजार, द्वितीय २१ हजार व तृतीय ११ हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचा निकाल अधिकृत माध्यमातून जाहीर करण्यात येईल.
आयोजकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच नियमांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील.
सर्व स्पर्धकांनी आपला निबंध १४ ते २० एप्रिल २०२६ या निर्धारित वेळेत सादर करावा.
अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयास संपर्क करावा.
जास्तीत जास्त उमेदवारांनी या स्पर्धचा लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन व केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

