
प्रतिनिधी|गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी राजीव गांधी सभागृह, इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली – व्हिजन २०४७’ या संकल्पनेवर सादरीकरण, संबोधन तसेच जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववानांचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ‘न्यूज जागर’चे जिल्हा प्रतिनिधी नितेश गट्टीवार आणि वैनगंगा न्यूज 24 चे मुख्यसंपादक श्रावण वाकोडे यांना जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७चे मुख्य प्रवर्तक, प्रदेशाध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा महाराष्ट्र राज्य तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पत्रकार नितेश गट्टीवार व श्रावण वाकोडे यांचा प्रमाणपत्र, शिल्ड, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि जिल्ह्यातील विविध घडामोडींना सातत्याने वाचा फोडणाऱ्या त्यांच्या कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.
जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीत विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव व्हावा, तसेच त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्यातील १२ ही तालुक्यांतील गावांचे प्रतिनिधी, उद्योजक, महिला उद्योजक, प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, NGO प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित या गौरव सोहळ्यात पत्रकार नितेश गट्टीवार व श्रावण वाकोडे यांचा झालेला सन्मान हा त्यांच्या कार्याची पावती मानली जात असून, या सन्मानामुळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

