
एटापल्ली : कोटमी ग्रामपंचायत अंतर्गत पैडी गावात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची संघटनात्मक व वैचारिक ताकद अधिक मजबूत झाली असून, कोटमी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महादेव पदा, पैडी गाव पाटील बारसु वडडे,सोनू नरोटे ग्रामसभा अध्यक्ष ,दिनेश वडडे ग्रामसभा सचिव ,दिपक पदा,संतोष मडावी, नितीन होळी,लालसू वडडे,मालू मटामी तसेच पैडी गावातील अनेक नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला. कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश करण्यात आला.
यावेळी कॉ. सुरज जक्कुलवार, जिल्हा सदस्य आणि कॉ. तेजस गव्हरे उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर पैडी गावातील नागरिकांची गोटूलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह विविध मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासींवर झालेला ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी त्यांच्या संविधानिक व कायदेशीर हक्कांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी जनसहभाग वाढवून शासन-प्रशासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यासोबतच गरज पडल्यास जनआंदोलन उभारण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “जनतेच्या प्रश्नांसाठी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर वर्षभर जनतेसोबत राहून संघर्ष करणे ही भाकपाची भूमिका आहे. जल, जंगल, जमीन, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी जनतेला संघटित करून लढा उभारला जाईल. निवडणुकीत जनतेच्या दरबारात जाऊन मत मागू आणि त्यांच्या अपेक्षेनुसार विकासकामे करून देऊ. जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष जारी रहेगा.”
पैडी गावातील नागरिकांनी भाकपाच्या विचारांवर विश्वास ठेवून केलेला पक्षप्रवेश हा जनतेच्या प्रश्नांवरील संघर्षाला बळ देणारा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कोटमी ग्रामपंचायत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या सहभागातून संघटित संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.

